आंतरराष्ट्रीय,
राष्ट्रीय,
महाराष्ट्र,
राजकीय,
खेळ,
क्राईम,
नवराष्ट्र मराठीन्यूज,
www.navrashtramarathi.in.net
मुख्यसंपादक -
वाशिम : जिल्ह्यातील राजकारणाचे केंद्रबिंदू असलेल्या रिसोड पंचायत समितीच्या अभिलेख कक्षाला दि.१५ मे रोजी रात्री साडे आठच्या दरम्यान अचानक आग लागली. सदर घटनेत महत्त्वाच्या फाईल जळून खाक झाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र आगीचे कारण अद्याप गुलदस्त्यात असल्याने अभिलेख कक्ष जळाले की जाळले अशी खमंग चर्चा जिल्हाभर होत आहे. येथील पंचायत समितीच्या घरकुल योजनेतील घोटाळ्याची वृत्तमालिका सिटीन्युज सुपरफास्टने नुकतीच प्रकाशित केली होती. त्या अनुषंगाने सदर आगीची घटना संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे. भ्रष्टाचाराचे पुरावे नष्ट करण्यासाठी तर ही आग लागली असेल का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
प्राप्त माहितीनुसार काल दि.१५ मे गुरुवारी रात्री साडे आठच्या सुमारास अचानक ही घटना घडली. सदर आगीत महत्वाची कागदपत्रे जळून खाक झाल्याची माहिती समोर येत आहे. तद्वतच अग्निशामक दलाच्या प्रयत्नाने आग नियंत्रणात आली अन्यथा मोठा अनर्थ घडला असता अशी सर्वत्र चर्चा होत आहे. मात्र रिसोड पंचायत समितीसाठी ही आगीची घटना काही नवखी नाही. याआधी सुद्धा आस्थापना विभागाला आग लागली होती. त्यावेळी शौचालय अनुदान घोटाळा मोठ्या प्रमाणात झाला होता हे सुद्धा सर्वश्रुत आहेच ! आणि सद्यस्थितीत दैनिक सिटीन्यूज सुपरफास्टने घरकुल योजनेतील घोटाळ्याची वृत्तमालिका प्रकाशित करून संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवून दिली होती. आणि लगेचच अभिलेख कक्षाला आग लागण्याची घटना घडते हा योगायोग म्हणावा की संयोग हे गूढ मात्र कायम असले तरी सिटीन्यूज सुपरफास्टचे भाकीत अखेर सत्यात उतरले अशी चर्चा सर्वसामान्य जनता करत आहे. परिणामी या गंभीर घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे.
नेमक्या कोणत्या फाईल जळाल्या..?
काही वर्षापूर्वी रिसोड पंचायत समितीच्या आस्थापना विभागाला आग लागून शौचालय अनुदानातील भ्रष्टाचार खाक करण्यात आला होता. आणि वर्तमानस्थितीत सिटीन्यूज सुपरफास्टने घरकुल योजनेतील भ्रष्टाचाराचे बिंग फोडले आहे. त्या पार्श्वभूमीवर सदर आगीत कोणत्या फाईल जळाल्या ? या प्रश्नाचे उत्तर शोधणे हे तपास यंत्रणेसाठी खुप महत्त्वाचे ठरणार आहे. शिवाय १५ व्या वित्त आयोगातील केवळ कागदोपत्री केलेल्या कामांच्या फाईल तर जळाल्या नाहीत ना ! हे पाहणे सुद्धा क्रमप्राप्त आहे. तसेच तालुक्यातील शाळांच्या दुरुस्ती कामातील बिल व मोजमाप पुस्तिका आणि समाज कल्याण योजनेतील वैयक्तिक लाभाच्या योजनेतील अर्ज व मंजुरीच्या फाईल शाबुत आहेत की त्यापण जळून खाक झाल्या आहेत हे पाहणे सुद्धा खुप महत्त्वाचे ठरणार आहे. घटना कोणत्या कारणाने घडली हे आज ना उद्या स्पष्ट होणार आहेच. परंतु सिटीन्यूज सुपरफास्टने येथील पंचायत समितीच्या भ्रष्टाचाराची पोलखोल केल्या नंतर लगेचच आगीची घटना घडली ही बाब सर्वांनाच अचंबीत करत आहे. परिणामी आग लागली की जाणीवपूर्वक लावण्यात आली असा प्रश्न सर्व सामान्य नागरिक विचारत आहेत.

Post a Comment
0 Comments